पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी : पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे
सिद्धिविनायक मंदिर परिसरात सिंगल युज प्लास्टिक विरोधात जनजागृती कार्यक्रमातून मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन
मुंबई, दि. 31: देशाचे जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून प्रदूषण कमी करणे, तसेच वन्यजीव आणि वनस्पतींचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. हा कार्यक्रम धार्मिक स्थळाच्या परिसरात पर्यावरणपूरक सवयी रुजविण्या बरोबरच पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित भविष्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर परिसरात नागरिकांमध्ये सिंगल युज प्लास्टिक टाळण्याचे आवाहन तसेच सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्रीमती. मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमास सिद्धिविनायक मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, सिंगल युज प्लास्टिकचा भस्मासुर रोखायलाच हवा, सिंगल युज प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे याकरिता सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यासाठी संकल्प, संयम आणि प्रत्यक्ष कृती याची नितांत गरज आहे. शासन स्तरावर सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. यासाठी विभागामार्फत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी धोरणे आणि नियम ही लागू करण्यात आले आहेत. सिंगल यूज प्लास्टिकवर निर्बंध घालण्याबरोबरच, जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळा, कॉलेज, आणि सार्वजनिक ठिकाणी जागरूकता मोहिम देखील राबवल्या जात आहेत. कार्यशाळा, चर्चासत्रे, आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश पोहोचवला जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमा अंतर्गत मंत्री पंकजा मुंडे यांनी सिद्धिविनायक मंदिर परिसरातील स्टॉलधारकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवण्याचे सांगत स्वत: कापडी पिशव्यांचे वाटप करून पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळण्याचे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी प्लास्टिकच्या पर्यायांविषयी माहिती देणारे सूचना फलकांबरोबरच पर्यावरण जनजागृतीच्या घोषवाक्यांनी मंदिर परिसराचे वातावरण दुमदुमून गेले. पर्यावरण रक्षणासाठी शासन, संस्था आणि नागरिकांनी एकत्र येवून काम केल्यास नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील असेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टने सुद्धा प्लास्टिक बंदीसंबंधी जनजागृती कार्यक्रमात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.