प्लास्टिक बंदीसाठी डोंबिवलीत पोळी-भाजी केंद्रांचे आवाहन
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर मोठे व्यापारी, दुकानदार आणि सर्व सामान्य नागरिकांनी स्वागत केले. शहरात सुमारे 100 पेक्षा जास्त भाजी पोळी केंद्रे असून लाखो नागरिक त्या केंद्रातून दरोरोज पोळीभाजी घेत असतात. या केंद्रातूनही आता बोर्ड लावण्यात आले असून ग्राहकांनी घरून डबा आणावा, प्लास्टिक पिशवीसाठी आग्रह धरू नये असे आवाहन केले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी या विषयी कामाला लागले आहेत. प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या दुकनदारांना दंड ठोठावण्यात येत आहे. याचे सर्वच थरातून याचे स्वागत झाले असून बाजारात महिला-पुरुष आता खरेदीसाठी कापडी पिशवी आणू लागले आहेत. हा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता असा सूर येथे उमटत आहे.
शहरातील बहुसंख्य घरात पती-पत्नी दोघेही कामावर जात असल्याने 100 पेक्षा जास्त भाजी पोळी केंद्रातून सकाळी कामावर जाताना पिशवीतून भाजी पोळी न्यायची व संध्याकाळी आल्यावर पोळी घेऊन घर गाठायचं असा येथील चाकरमान्यांचा दिनक्रम असतो. पण प्लास्टिक बंदीमुळे या केंद्रांनी केंद्राबाहेर बोर्ड लावले असून ग्राहकांनी डबा आणावा असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे जे लहान स्नॅक्स मिळण्याची ठिकाणे आहेत त्यांनीही असे फलक लावले आहेत. इडली, मेंदूवडा, बटाटा वडा देताना चटणी केळीच्या पानावर देण्यात येत असून सांबार मात्र देता येत नाही. यासाठी पर्याय शोधत असल्याचे गोग्रास वाडीतील रुची सम्राटचे प्रमोद शानभाग यांनी सांगितले.
डोंबिवलीत ज्यांनी प्रथम भाजी पोळी केंद्र सुरू केले त्या कानिटकर कुटुंबातील संजीव कानिटकर म्हणाले, शहरात सुमारे 100 पेक्षा जास्त भाजी पोळी केंद्र असून सुमारे 1500 लोकांची उपजीविका यावर आहे. तसेच लाखो नागरिक याचा लाभ घेत आहेत. प्लास्टिक बंदीचा निर्णय योग्य असून नागरिकांना आम्ही घरून डबा आणण्याचे आवाहन केले आहे. तसेच मिठाईचे दुकानदार श्रीपाद व श्रीरंग कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिका आयुक्त गोविद बोडके याची भेट घेऊन प्लास्टिक बंदीला विरोध नाही मात्र जे मिठाईचे पदार्थ आहेत ते कसे ठेवणार असा प्रश्न करून यासाठी अवधी देण्याची विनंती केली आहे. शहरात विविध सामाजिक, राजकीय पक्षांनीही बंदीचे स्वागत केले असून सहकारी गृह निर्माण सोसायटी देखील सरसावल्या आहेत. प्लास्टिक बंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण यावरच पुढील पिढीचे भवितव्य अवलंबून आहे अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत.