भांडुपच्या उंच भागांसाठी इलेक्ट्रिक मिडी बसेस; शाश्वत सार्वजनिक वाहतुकीला चालना : राजोल संजय पाटील यांचा पाठपुरावा

मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) :भांडुप परिसरातील उंच टेकड्यांवर आणि अरुंद रस्त्यांलगत वसलेल्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी इलेक्ट्रिक मिडी बसेस सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लहान आकाराच्या आणि वातानुकूलित विद्युत बसेसमुळे या भागातील नागरिकांना अधिक सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होण्याबरोबरच शहरातील शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
भांडुपमधील गाढव नाका, साई विहार, साई हिल, नगरदास नगर, शिवाजीनगर, संभाजी चौक, वैभव चौक, टेंभीपाडा आणि गणेशनगर यांसारख्या परिसरांमध्ये अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि वळणे असल्याने मोठ्या आकाराच्या बसगाड्या चालविण्यात अडचणी येतात. परिणामी, काही भागांमध्ये नियमित सार्वजनिक बससेवा पोहोचविणे आव्हानात्मक ठरत होते.
ही बाब लक्षात घेऊन शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी बेस्ट प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून भांडुपच्या उंच आणि अरुंद रस्त्यांच्या परिसरासाठी लहान आकाराच्या मिडी बसेस सुरू करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नासाठी त्यांनी पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष पाठपुरावा केला.
इलेक्ट्रिक बसमुळे पर्यावरणीय फायदा
मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात सार्वजनिक वाहतुकीचे विद्युतीकरण हे वायू प्रदूषण आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. इलेक्ट्रिक बसेसचा वाढता वापर हा शाश्वत शहरी वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
विशेषतः नागरिकांना त्यांच्या घराजवळून सार्वजनिक वाहतूक उपलब्ध झाली, तर खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि वाहनांमधून होणारे स्थानिक प्रदूषण कमी करण्यास अप्रत्यक्ष हातभार लागू शकतो.
या मिडी बसेसमध्ये कमी उंचीचा फ्लोअर असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती आणि व्हीलचेअर वापरणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी, संपूर्ण एअर सस्पेंशन आणि जलद डायरेक्ट करंट चार्जिंग यांसारख्या सुविधा या बसेसमध्ये असणार आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ३६० अंश सीसीटीव्ही कॅमेरे, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम तसेच बॅटरी कंपार्टमेंटमध्ये आग लागल्यास ती शोधून नियंत्रित करण्यासाठी फायर डिटेक्शन अँड सप्रेशन सिस्टीम यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील.
लोकमान्य टिळक टर्मिनससाठीही बससेवेची मागणी
दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून भांडुप, विक्रोळी, मुलुंड, घाटकोपर तसेच मुंबईतील विविध भागांसाठी बेस्ट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणीही राजोल पाटील यांनी केली आहे. रेल्वे स्थानकांपासून निवासी भागांपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत झाल्यास नागरिकांना खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारणे अधिक सोयीचे होऊ शकते.
शाश्वत वाहतूक व्यवस्थेला हातभार
भांडुपच्या टेकड्यांवरील आणि अरुंद रस्त्यांच्या परिसरात इलेक्ट्रिक मिडी बसेस प्रत्यक्ष सुरू झाल्यास या भागातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होण्याबरोबरच मुंबईच्या हरित आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेला हातभार लागण्याची अपेक्षा आहे. मात्र, इलेक्ट्रिक बससेवेचा पर्यावरणीय फायदा अधिक प्रभावी करण्यासाठी वीज निर्मितीतील अक्षय ऊर्जेचा वाटा वाढविणे, बससेवेची नियमितता राखणे आणि नागरिकांना खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
सात हजार कोटींच्या नियोजनाचा भाग
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी बेस्टकडून २०२७ पर्यंत बस ताफा वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनाचा एक भाग म्हणून सुमारे सात हजार कोटी रुपयांच्या खर्चातून १,५०० मिडी इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याची योजना आहे. या बसेस टप्प्याटप्प्याने बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असून पहिल्या टप्प्यात २५० बसेस दाखल होण्याची अपेक्षा आहे.





