पवई तलावाच्या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा
तलावातील जलपर्णी काढण्याकामी तात्काळ ५ संयंत्रे, अधिक मनुष्यबळाचा वापर करावा
निविदा कार्यवाही अधिक वेगाने करण्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश
पवई तलावाच्या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळत असल्याने जलपर्णी अधिक वेगाने फोफावत आहे. त्यासाठी पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे या दोन कामांच्या स्वतंत्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पवई तलावाच्या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा आहे. त्यामुळे या कामाची निविदा कार्यवाही अधिक वेगाने करत कार्यारंभ आदेश (Work Order) पुढील आठवड्यात द्यावा, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. जलपर्णी काढण्यासाठी तात्काळ ५ संयंत्रे आणि अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करावा, असेदेखील निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
मागील काही दिवसांपाूसन पवई तलावात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जलपर्णीने तलावाचा पृष्ठभाग व्यापला आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आज (दिनांक २० मे २०२५) महानगरपालिका मुख्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी विविध निर्देश दिले.
पवई तलाव परिसरात वाढलेले नागरिकरण आणि तलावामध्ये येणारे सांडपाणी इत्यादी कारणांमुळे तलावामध्ये जलपर्णी, इतर अनावश्यक वनस्पतींची वाढ झाली आहे. जलपर्णींची अनावश्यक वाढ झाल्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकून जातो आणि पाण्याची गुणवत्ता तसेच जैवविविधता यावर प्रतिकूल परिणाम होतो. एवढेच नव्हे तर सूर्यप्रकाशाचे पाण्यातील परावर्तन कमी होऊन तलावातील माशांचे खाद्य असणा-या वनस्पतींची वाढ खुंटते आणि अन्नसाखळीत अडथळा निर्माण होतो. पाण्याची गुणवत्ता देखील खालावते. या सर्व बाबी लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पवई तलाव आणि परिसरात जैवविविधता संरक्षणाची जी विविध कामे सुरू केली आहेत, त्यामध्ये तलावातील जलपर्णी काढणे आणि क्षेपणभूमीवर त्याची विल्हेवाट लावणे, ही एक महत्त्वाची कार्यवाही सुरू केली आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर म्हणाले की, पवई तलावातील सांडपाण्याचा निचरा करण्याकरिता महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रकल्प) खात्यामार्फत २ निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यात मलनिस्सा:रण वाहिनी अंथरणे आणि ८ दशलक्ष लीटर (MLD) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे या दोन कामांचा समावेश आहे. पवई तलावात १८ दशलक्ष लीटर सांडपाण्याचा प्रवाह येतो. त्यापैकी ८ दशलक्ष लीटर सांडपाणी हे सध्या बंद असलेल्या पवई उदंचन केंद्राच्या जागेवर प्रस्तावित आहे. ८ दशलक्ष लीटर सांडपाणी हे प्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करुन ते पुन्हा तलावात टाकण्यात येईल. तसेच, उर्वरित ८ दशलक्ष सांडपाणी हे आदि शंकराचार्य मार्गावरील अस्तित्वात असलेल्या मलनिस्सा:रण वाहिनीद्वारे भांडुप येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळते करण्यात येणार आहे. उर्वरित २ दशलक्ष सांडपाणी हे पेरु बाग येथील उदंचन केंद्राकडे वळवून मलनिस्सारण वाहिनीद्वारे मिठी नदीवरील ९ दशलक्ष लीटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळते करण्यात येणार आहे. यामुळे, पवई तलावात येणा-या सांडपाण्याच्या प्रवेशाला अटकाव करुन वळवणे याकरिता मदत होणार आहे. या कामाची निविदा कार्यवाही अधिक वेगाने करत कार्यारंभ आदेश (Work Order) पुढील आठवड्यात द्यावा, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.
पवई तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही सुरु आहे. गत सहा महिन्यांत सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. तथापि, जलपर्णी वाढीचा वेग अधिक असल्याने ती तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ज्या गतीने जलपर्णी काढली जात आहे, त्यापेक्षा कित्येक पट अधिक गतीने जलपर्णी वाढत आहे. एकूणच, जलपर्णीच्या आच्छादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पवई तलावात सांडपाणी, मलजल मिसळत असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणावर फोफावते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा आहे. जोपर्यंत मलजल वाहिन्या वळविण्याचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत जलपर्णी काढण्याची गती अधिक वाढविणे आवश्यक असल्याचे श्री. अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
आजमितीला जलपर्णी काढण्याची कार्यवाही २ संयंत्राद्वारे सुरू आहे. ती अधिक प्रभावी होण्यासाठी तात्काळ ५ संयंत्रांच्या माध्यमातून जलपर्णी काढण्याचे काम सुरू करावे. त्यासाठी दोन सत्रांमध्ये (Shift) अधिकचे मनुष्यबळ वापरून जलपर्णी हटविण्याच्या कार्यवाहीस अधिक वेग द्यावा. पावसाळ्यानंतर ६ संयंत्रे तैनात करावीत. जलपर्णी काढल्यानंतर क्षेपणभूमीवर विनाविलंब विल्हेवाट लावावी, त्यासाठी वहन व्यवस्था सक्षम करावी, अशी सूचना श्री. बांगर यांनी केली.
तलावातून जलपर्णी काढताना जैव विविधतेस कोणताही हानी पोहोचू नये, यासाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ संस्थेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली जाणार आहे. जलपर्णी काढण्याच्या कार्यवाहीत निसर्ग अभ्यासक, पक्षी अभ्यासक, पक्षी निरीक्षक यांनी केलेल्या सूचना विचारात घ्याव्यात. या सुचनांचा यथायोग्य समावेश जलपर्णी काढण्याच्या कामांमध्ये करावा, यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेच्या प्रतिनिधींनी तलाव क्षेत्रात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. पवई तलाव येथे कांस्यपंखी कमळपक्षी (Bronze Wing Jacana) आणि जांभळी पाणकोंबडी (Grey Headed Swamphen) यांचा अधिवास आहे. सामान्यपणे दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतचा कालावधी हा या पक्ष्यांचा प्रजोत्पादन / विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे या पक्ष्यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होवू शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येवू शकतो, असे मतप्रदर्शन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या प्रतिनिधींनी नोंदविले आहे. त्याची दखल घेऊन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या प्रमुख पदाधिकारी, पक्षीनिरीक्षक यांच्यासमवेत संवाद साधावा. त्यांच्याशी समन्वय साधूनच व सल्ल्याुनसारच जलपर्णी काढण्याचे काम करण्यात यावे. तज्ज्ञांसमवेत महानगरपालिकेच्या अधिका-यांनी पवई तलावास प्रत्यक्ष भेट देऊन जलवाहिनी मार्ग (हॉटेल वेस्टीन), गणेश घाट, पवारवाडी घाट आणि आय. आय. टी. मुंबई इत्यादी ठिकाणांची पाहणी करावी, असेदेखील निर्देश श्री. अभिजीत बांगर यांनी दिले.
उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. शशांक भोरे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. यतीन दळवी, जल अभियंता श्री. पुरूषोत्तम माळवदे, मुख्य अभियंता (मलनि:सारण प्रकल्प) श्री. विनोद केकाण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेचे (BNHS) प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.