जीवनदान’च्या माध्यमातून अवयवदान जनजागृतीला नवी दिशा, राजोल संजय पाटील यांच्या पुढाकाराला आमिर खान, डॉ. निरंजन हिरानंदानी यांची साथ
मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) – समाजात अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करून अधिकाधिक नागरिकांनी या महान कार्यात सहभागी व्हावे, या उद्देशाने वांद्रे येथे आयोजित करण्यात आलेल्या अवयवदान जनजागृती कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते आमिर खान, उद्योगपती डॉ. निरंजन हिरानंदानी, आर. डी. अँड एस. एच. नॅशनल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. नेहा जगतियानी, सहर भामला यांच्यासह ‘जीवनदान’ संस्थेच्या संस्थापिका तथा नगरसेविका राजोल संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्व. दिना बामा पाटील प्रतिष्ठान, जीवनदान संस्था, भामला फाऊंडेशन व आर. डी. नॅशनल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून अवयवदानाचे सामाजिक महत्त्व आणि त्याबाबतची जनजागृती वाढविण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. अवयवदान ही केवळ वैद्यकीय गरज नसून ती मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आजही समाजात अवयवदानाबाबत अनेक गैरसमज आणि माहितीचा अभाव असल्याने अशा जनजागृती उपक्रमांची आवश्यकता अधिक असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

‘जीवनदान’ संस्थेच्या माध्यमातून राजोल संजय पाटील यांनी अवयवदान व नेत्रदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभारले आहे. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ३ हजारांहून अधिक डोळ्यांचे दान घडवून आणण्यात आले असून त्यामुळे अनेक अंध व्यक्तींना नव्याने दृष्टी मिळाली आहे. समाजसेवेच्या या कार्यामुळे ‘जीवनदान’ संस्था अवयवदान जनजागृतीच्या क्षेत्रात विश्वासार्ह नाव म्हणून ओळख निर्माण करत आहे.
याचबरोबर स्व.दिना बामा पाटील प्रतिष्ठान सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांद्वारे सातत्याने समाजकार्यात योगदान देत आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्थापन झालेल्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक ग्रंथालये चालविण्यात येत असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, शैक्षणिक मदत तसेच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिष्ठानचे कार्य मोलाचे मानले जाते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन करताना, प्रत्येक नागरिकाने या चळवळीत सहभागी होण्याची गरज व्यक्त केली. एक अवयवदाता किमान आठ जणांचे प्राण वाचवू शकतो. त्यामुळे अवयवदान हा जीवनदानाचा सर्वात मोठा संदेश आहे, असे प्रतिपादन राजोल संजय पाटील यांनी केले. या उपक्रमामुळे अवयवदानाबाबत समाजात सकारात्मक विचार निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.






