हिवताप विभागाचा आकृतीबंध लोकसंख्येच्या प्रमाणानुसार करा : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई, दि. 15 : राज्यातील हिवताप विभागाचा आकृतीबंध हा लोकसंख्येच्या प्रमाणानुसार करण्यात यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
निर्मल भवन येथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विधान परिषदेचे सदस्य संजय केनेकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, पावसाळ्यात ग्रामीण भागात विविध आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे केवळ आरोग्याचे नव्हे, तर कुटुंबांचे आर्थिक नुकसानही होते. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून नागरिकांना उत्तम सेवा मिळावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. बायोमेट्रिक प्रणालीत सुधारणा करावी, प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढवावी तसेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पदोन्नती देण्यात यावी किंवा आर्थिक लाभ देण्याचाही विचार करण्यात यावे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असेही राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.